राज्यातील गृह खात्याच्या इभ्रतीचे धिंडवडे, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - राजेंद्र पातोडे

 


मुंबई - राज्याचे गृहमंत्री  शोभेचे पद बनले असून देश लॉकडाऊन असताना पोलिसांवर हल्ले होत आहेत तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री नागरिकांना उचलून त्यांना मारहाण करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संचारबंदीत सामान्य नागरिकांना रस्त्यावर चोपले  जात आहे तर दुसरीकडे यस बँक घोटाळ्यातील आरोपींना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी बहाल केली जाते. यामुळे गृहमंत्री यांचा स्वत:च्या खात्यावर प्रभाव नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
                रस्त्यावर आलात तर पोलीसांनी काठ्यांना तेल लावले आहे. असे सर्व सामान्य नागरिकांना वृत्त वाहिनीवर धमकविणारे गृहमंत्री राज्याला लाभले आहे. मात्र त्याच वेळी डीएचएफएल आणि यस बँक घोटाळ्यात आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबियांना देशात संचारबंदी लागू असताना महाबळेश्वरला प्रवास करण्यासाठी विशेष परवानगी पत्र दिली जाते. महाबळेश्वरला जाताना त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठेच अडवला जात नाही. कारण गृह खात्याचे वि़शेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता हे वाधवान कुटुंबियांना पत्र देतात. पोलीस प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या अमिताभ गुप्ता यांना तातडीने बर्खास्त करून वाधवान कुटुंबियांना सहकार्य केले म्हणून त्यांना सहआरोपी केले पाहीजे होते. परंतु त्यांना चौकशी होईपर्यंत केवळ सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. 



 त्याच बरोबर एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारझोड केल्याचा आरोप एका कॅबिनेट मंत्र्यांवर केला जातो, या प्रकरणात मंत्र्यांचे अंगरक्षक व पोलीस अधिकाऱ्यांची नावे बाहेर येतात. तरीही गृहमंत्री शांतच असतात. सदाशिव भिडेसारखे लोक जाहिरपणे गौमूत्र व तुपाने कोरोना बरा होतो अशी अफवा पसरवतात. अश्या लोकांवर गुन्हा ही दाखल केला जात नाही.त्या उलट गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी करायला गेलेल्या लोकांवर संचारबंदी मोडली म्हणून त्यांना आरोपी केले जाते.


तबलीगीच्या कार्यक्रमास परवानगी दिली म्हणून केंद्रीय गृहमंत्री व अजित डोवाल यांच्यावर खळबळजनक आरोप करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या पत्रावर राज्याच्या गृहामंत्र्यांचे नाव व सही आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमातून बातम्याही आल्या. परंतु गृहमंत्री ते पत्र ऑफिशियल आहे वा नाही याचा खुलासा देखील करीत नाही. पत्रातील आरोप गंभीर असताना ते मुग गिळून गप्प बसले आहेत. 
कालच औरंगाबाद मध्ये पोलिसांवर हल्ला झाला, त्या आधी नागपुरात पेरोल वर सुटलेल्या आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीची हत्या केली. मराठवाड्यात दलित कुटुंबावर कोरोना पिडीत म्हणून हल्ला करण्यात आला. दलित अत्याचाराची बरीच प्रकरणे लॉकडाऊन पुर्वी घडली. त्यावेळी गृहमंत्री यांना तेल लावलेल्या काठ्या का दाखवता आल्या नाही, असा सवालही वंचितने केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृह विभाग झेपावत नसल्याने त्यांनी राजीनामा देऊन पर्यटन खाते मागून घ्यावे, असा खोचक सल्ला देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.